नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती; एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, नांदेड ०७ जुलै २६
जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR – २०२६) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, तसेच एकही अपात्र मतदार यादीत समाविष्ट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. तसेच, या मोहिमेच्या प्रभाव अंमलबजावणीसाठी माध्यमांनी व्यापक जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही मोहीम राबवली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण २७ लाख ७७ हजार ०७३ मतदारांच्या माहितीची अचूक पडताळणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ३०८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे पुढील प्रमाणे ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO प्रत्येक घरी जाऊन गणना प्रपत्र देतील आणि माहिती संकलित करतील.
५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ या काळात प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील.
प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
या विशेष मोहिमेसाठी जिल्हा स्तरावर ५५ लाख ५४ हजार १४६ ‘इन्युमरेशन फॉर्म‘ची छपाई करण्यात आली असून, ते मतदारांच्या घरी वाटप केले जात आहेत. मतदारांनी स्वतःची, आई–वडिलांची किंवा आजी–आजोबांची माहिती अचूकपणे तपासून हा फॉर्म भरून BLO यांच्याकडे जमा करावा.
ज्या मतदारांची नावे २००२ च्या मतदार यादीत आहेत, त्यांना केवळ आपली माहिती पडताळून गणना फॉर्म भरून जमा करणे आवश्यक आहे; त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. मात्र, यादीतील फोटो अस्पष्ट किंवा योग्य आकाराचा नसल्यास मतदारांनी पासपोर्ट साईज कलर फोटो प्रपत्रा सोबत देणे अनिवार्य आहे.
कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेतून सुटू नये यासाठी मतदारांनी गृहभेटीच्या वेळी BLO यांना आवश्यकती माहिती देऊन सहकार्य करावे. घरभेटीच्या वेळी कोणी भेटले नाही, तर त्यांना ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी नागरिकांना voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल किंवा १९५० या टोल–फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
“आपले सहकार्य, देशाचा अभिमान – एकही मतदार राहणार नाही वंचित!” या संकल्पासह प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.




