भ्रष्टाचाराचा प्रताप! अवघ्या वर्षभरातच नांदेड-नागपूर-तुळजापूर महामार्ग खचला; उड्डाणपुलाचा भाग कोसळून निष्पापांचा जीव धोक्यात.

▫️विष्णुपुरीतील भीषण अपघातात दोन मुली गंभीर जखमी; निकृष्ट कामामुळे एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती!
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क नांदेड | ०९ जुलै २०२६
विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा एक भयंकर चेहरा आज नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. केवळ एका वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालेल्या नांदेड–नागपूर–तुळजापूर महामार्गाचा आणि विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा काही भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. याभीषण अपघातात दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून, एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विष्णुपुरी जवळील श्री गुरुवंशी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर अचानक रस्ता खचला आणि पुलाचा बाजूचा भाग कोसळला त्यामुळे दोन मुली गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे
पुलाचे आणि रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे एक वर्षही उलटले नाही, तोच रस्ता खचल्याने बांधकामाच्या दर्जाची पोलखोल झाली आहे
अवघ्या वर्षभरातच जर महामार्ग खचत असेल, तर हा विकास आहे की कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे खिसे भरणारी योजना?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला थेट कंत्राटदाराचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप स्थानिकांनी केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी मुलींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा खोळंबाझाला आहे.
निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भ्रष्ट कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी गुन्हा दाखल होणार का? की पुन्हा एकदा चौकशीच्या नावाखाली या प्रकरणावर पडदा टाकला जाणार? प्रशासनाने आता केवळ आश्वासने न देता ठोसकारवाई करून जनतेला उत्तर देण्याची वेळ आली आहे.



