स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही भटका समाज मूलभूत कागदपत्रांपासून वंचित; विविध मागण्यांसाठी मुखेड तहसीलदारांना साकडे

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०३ सप्टेंबर २६
देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे उलटली असली तरी, भटक्या समाजातील नागरिकांना आजही आधारकार्ड, राशनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी व जात प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत प्रशासकीय कागदपत्रांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. विविध प्रमाणपत्रे मिळविताना आजही अनेकअडचणींचा सामना करावा लागत असल्याने, हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहा पासून कोसो दूर असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. या समस्येकडे लक्ष वेधत, प्रशासनाने ही कागदपत्रे सुलभतेने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता असणे अनिवार्य असते. मात्र, दप्तर दिरंगाई आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे भटक्या समाजातील नागरिक या योजनांपासून वंचित राहतआहेत. या पार्श्वभूमीवर, समाजातील नागरिकांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे विना अडथळा व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्यावीत, तसेच या उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
तहसीलदारांना हे निवेदन देताना नगरसेवक विनोद दंडलवाड, भटक्या समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे, दिलीप बाबर, शिंदे बेटमोगरेकर यांच्यासह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



