मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश: राज्य सरकारकडून ५ प्रमुख मागण्या मान्य

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०३ सप्टेंबर २६
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांच्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.

या चर्चेनंतर जरांगे यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना ४ सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले असून, अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याच्या सूचनामंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

या बैठकीत सरकारने जरांगे यांच्या पाच प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, १० तारखेला प्रमाणपत्रा विषयी अधिकृत शासन निर्णय (GR) काढण्याची घोषणा केली आहे. तसेच, जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फी भरावी लागली आहे त्यांचे पैसे परत दिले जातील, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे सरकारने सांगितले.

कुणबी प्रमाणपत्राचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी दर महिन्याला विशेष शिबिरे आयोजित केली जातील आणि प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

याशिवाय, मराठा समाजाच्या जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही सरकारी शिष्टमंडळाने दिली आहे.



