अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी सिटू चे मनपासमोर धरणे आंदोलन

नांदेड प्रतिनिधी – शहरामध्ये झालेल्या पूरग्रस्तांना शासनाकडून मंजूर झालेले अनुदान आणि धान्याची किट देण्यात यावी या मागणीसाठी सीटू च्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नांदेड शहर व जिल्ह्यामध्ये २७,२७ जुलै २०२३ रोजी अतिवृष्टी होऊन गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामध्ये नांदेड शहरातील अतिवृष्टी ग्रस्त लोकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्या मंजूर झालेल्या यादीमध्ये बऱ्याच नुकसानग्रस्त लोकांची नावे नव्हती त्यामुळे बरेच नुकसानग्रस्त नागरिक शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत.अशा नुकसानग्रस्त नागरिकांची नव्याने यादी करण्यात यावी आणि ती नांदेडच्या तहसीलदारांना देण्यात यावी तसेच शासनाचे मंजूर झालेले १० हजार रुपये आणि १४ जीवनावश्यक वस्तूंची किट या नुकसानग्रस्त नागरिकांना देण्यात यावी या मागणीचे निवेदन सीटू चे जनरल सेक्रेटरी गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त यांना देण्यात येऊन मनापासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रती नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि पोलिस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड यांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर सीटू चे जनरल सेक्रेटरी गंगाधर गायकवाड, श्याम सरोदे, सोनाजी कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



