तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे कडब्याला भीषण आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

मुखेड/ तुपदाळ खु प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २६ मे २६
तालुक्यातील तुपदाळ खु. येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील कडब्याच्या गंजीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत हणमंत रघुनाथ बोडके, जळशिंग मारोती बोडके आणि दादाराव नामदेव दोमाटे या शेतकऱ्यांच्या जवळपास १५ ते २० हजार कडबा पेंढ्या जळून खाक झाल्या असून, अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. याच कडक उन्हामुळे तुपदाळ खु. येथील शेतात साठवून ठेवलेल्या कडब्याच्या गंजीने अचानक पेट घेतला. वाळलेला कडबा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ढीग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. वर्षभर जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून साठवून ठेवलेला चारा डोळ्यादेखत जळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
आगीची माहिती मिळताच तुपदाळचे सरपंच संदिप चंद्रकांतराव घाटे तुपदाळकर यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी मुखेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दल पोहोचेपर्यंत सरपंच संदिप घाटे, धोंडगीर महाराज गिरी, गजानन गिरी ग्रामपंचायत सेवक, ज्ञानेश्वर दोमाटे, उद्धव पाटील बोडके, अमोल पाटील बोडके, रणवीर दोमाटे, शिवाजी गुरुजीबोडके, माधव दोमाटे, दुर्योधन दोमाटे, सचिन दोमाटे आणि तुकाराम पिटलेवाड यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवण्यासाठी मदत केली.
या भीषण आगीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे.



