हदगाव शहरातील गायरान जमीन भुमाफीयांच्या घशात…

शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून मांडला प्लाॅटींगचा बाजार…
शासनाचा भुखंड वाचवण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे धाव…
नांदेड:-(प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात सर्वत्र भुमाफीया आपले डोके वर काढत आहेत. त्यात हदगाव तालुकाही मागे राहिलेला नाही.शहराच्या लगतच असलेला शासनाचा गायरान जमीनीचा भुखंड एका शेतकऱ्याला वहितासाठी दिला होता. परंतू त्या शेतकऱ्याने शासनाला अंधारात ठेवून तो भुखंड भुमाफीयाच्या घशात घालण्याचा प्रकार हदगाव तालुक्यात घडला आहे.
सविस्तर वृत्त असे की, हदगाव शहरातील गायरान जमीन असलेल्या भुखंडाचे श्रीखंडात रूपांतर करण्यात आले आहे. हदगाव शहरातील हदगाव ते तामसा मुख्य रस्त्यालगत शासनाची काही गायरान जमीन होती. ही गायरान जमीन एका शेतक-यांच्या ताब्यात होती. सदरील शेतक-यांने एका व्यापारी व्यवसाय करणा-या व्यापा-यांला हा भूखंड एक ते दोन करोड रूपयाला विकला असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. सदरील व्यापारी मात्र त्या भूखंडाचे प्लाॅटींग मध्ये रुपांतर करून विक्री करून खाण्यात मश्गुल झाला असल्याची चर्चा संबध हदगाव तालुक्यात होत आहे.
सदरील गायरान भूखंडाची बॉन्ड वर परस्पर विक्री करणा-या शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर व डोळेझाक करणारे अधिकारी यांच्या वर योग्य गुन्हे दाखल करून शासनाचे गायरान असलेला भुखंड भुमाफीयाच्या घशातून वाचवा. अशा आशयाचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना दि. ०५ डिसेंबर २०२३ रोजी देण्यात आले आहे.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना निवेदन कर्ते विद्या वाघमारे व मारोती शिकारे म्हणाले की, शासनाचा गायरान जमीनीचा भुखंड भुमाफीयाच्या घशातून वाचवण्यासाठी दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी पासून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. जो पर्यंत शासनाचा असलेला भुखंड वाचणार नाही तो पर्यंत आम्ही आमचे उपोषण मागे घेणार नाही.
सदरील निवेदनावर निवेदन कर्ते यांच्या सह्या आहेत. त्या निवेदनाच्या प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. , मा. उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय हदगाव., मा. पोलीस अधिक्षक साहेब, पोलीस अधिक्षक कार्यालय औरंगाबाद., मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय हदगाव जिल्हा नांदेड., मा. पोलीस निरीक्षक साहेब, सिटी चौक, पोलिस स्टेशन औरंगाबाद. यांना देण्यात आल्या आहेत. परंतु उपोषण कर्ते यांना न्याय मिळेल की, प्रशासन भूमाफियांना साथ देईल. या विषयी हदगाव शहरात जनतेत खमंग चर्चा होताना दिसत आहे.



