परभणी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर उद्या महाराष्ट्र बंदची हाक

आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी मागणी!
परभणी : जिल्ह्यातील दगडफेक प्रखरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय.
दरम्यान या प्रकरणामुळे आता परभणीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या तरुणांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
परभणी येथील घटनेचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध केला आहे. तसेच सोमनाथ यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. सोबतच त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला आहे. सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केल आहे. “परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायक आहे,” अशा भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या.



