बिबट्या निर्दोष! जन्मदाताच निघाला खूनी

मुखेड प्रतिनिधी:- २१ सप्टेंबर
मुखेड तालुक्यातील तांदळी येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील जन्मदात्यानेच आपल्याच मुलाचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळटिकला नाही चार दिवसातच त्याचं बिंग फुटलं आहे.
१६ सप्टेंबर रोजी बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार देणाऱ्या वडीलानेच मुलाचा खूनकेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी वडील उत्तम विठ्ठल जाधव (६५) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे
याबाबत माहिती अशी की, मयत जनार्दन हा आई वडीलांसोबत भांडणे करायचा. ३० ऑगस्ट रोजीजनार्दन याने आई सुमनबाई व वडीलास बेदम मारहाण केली. आईस कपडे काढून मारहाण केली. यामुळे वडील उत्तम जाधव यांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री नांदेडहून तांदळी येथे जाऊन आखाड्यावरील पत्रावर गाढ झोपलेल्या मुलावर कोयत्याने छातीवर तीन तर पाठीवर १९ वार केले. त्यानंतर मुलीकडे जाऊन मुक्काम केला होता. १७ रोजी मयत जनार्दनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची खबर वडील उत्तम जाधव यांनी दिली होती. त्यामुळे पोलीस व वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला म्हणून चौकशी करीत होते. पण पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी खुनाच्या अँगलने तपास केला असता मयताचे वडील उत्तम विठ्ठल जाधव यांनी २० रोजी मीच मुलाचा खून केला, अशी कबुली दिली.
तपास मुखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, अभिजित तुतूरवाड, संदीप यामावार, अंमलदार रविंद्र भुले, रुपेश हासुळे, मोहन स्वामी यांनी विशेष तपास करुन आरोपी शोधून काढल आणि पोलिस उपनिरीक्षक अभिजित तुतूरवाड यांच्या तक्रारीवरून विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



