मुखेड तालुक्यात अवकाळीचा तडाखा; रब्बी पिके आडवी, बळीराजा संकटात

मुखेड (प्रतिनिधी): २४ फेब्रुवारी २६
तालुक्यात सोमवारी (दि. २३) दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असतानाच, सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊण ते एक तास चाललेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले असून काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा आ ,आणि करडई ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणीज्वारी काढणीला आली होती, तर गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत होता. मात्र, वादळी वाऱ्यामुळे उभी पिके जमिनीला लागली आहेत. पावसामुळे हरभऱ्यालाही फटका बसला असून पिकांचा दर्जा घसरण्याची भीतीव्यक्त होत आहे.
वादळी वाऱ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याच्या आणि झाडेपडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडूनमदत जाहीर करावी, अशी मागणी मुखेड तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.



