न्यायासाठी ८० वर्षीय मरुबाई कांबळे यांचे ‘आमरण उपोषण’! प्रशासकीय आश्वासनानंतरही मरुबाईंच्या जागेचा प्रश्न कायम

▫️तहसीलदारांच्या दिलेले लेखी आश्वासन हवेतच;उपोषणाचा आजचा पाचवा दिवस
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ०३ एप्रिल २६
तालुक्यातील खरब खंडगाव येथील मरुबाई सखाराम कांबळे (वय ८० वर्षे) या वयोवृद्ध दलित महिलेच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळवून देण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. १३ जानेवारी२०२६ रोजी तहसीलदारांनी लेखी पत्र देऊनही अतिक्रमण धारकांवर कोणतीही कारवाई न झाल्याने, संतापलेल्या मरुबाई कांबळे यांनी आता ‘आमरण उपोषण’ पुकारले आहे.
यापूर्वी १२ जानेवारी रोजी मरुबाई कांबळे उपोषणास बसल्या होत्या. त्यावेळी प्रशासनाने १३जानेवारीला लेखी पत्र देऊन बेकायदेशीर बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले होते आणि “आम्ही तातडीने कारवाई करत आहोत” असे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या या शब्दावर विश्वास ठेवून ८० वर्षांच्या माउलीने उपोषण मागे घेतले होते. मात्र, दोन महिने उलटूनही जागेचा ताबा मिळाला नाहीच, उलट अतिक्रमण धारकांनी प्रशासनाला न जुमानता पुन्हा बांधकाम सुरू केल्याने प्रशासनाची नाचक्की झाली आहे.
मयत पतीच्या नावे असलेली ही जागा हडपण्यासाठी गावातील काही लोकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाहाताशी धरून हे कारस्थान रचल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे हे प्रकरण प्रलंबित असतानाही, अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना प्रशासनातील कोणाचे अभय आहे? असा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे.
वयोवृद्ध मरुबाई कांबळे आणि त्यांच्या सूनबाई लक्ष्मीबाई कांबळे यांनी ३० मार्च २०२६ पासून पुन्हा एकदा मुखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे की, केवळकागदी घोडे नाचवून आमची फसवणूक करू नका. जोपर्यंत जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही आणि अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत अन्न-पाण्याचा त्याग करून हे आमरण उपोषण सुरूच राहील.
एका ८० वर्षांच्या वृद्धेला न्यायासाठी जिवाचं बलिदान देण्याची वेळ येणे, हे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. आता जिल्हा प्रशासन या आजींना न्याय देतं की अघटित घडण्याची वाट पाहतं, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



