हिमायतनगर नगरपंचायतीचा ‘स्वच्छता’ नावाचा फार्स! नालीतील कचरा ४ दिवसांपासून रस्त्यावरच सडतोय; अर्धा कचरा पुन्हा नालीत!

▫️कचरा वेळेवर उचलण्यास प्रशासनाला मिळेना मुहूर्त; बाजाराच्या दिवशीही व्यापारी अन् नागरिकांचीकोंडी, जनतेमध्ये तीव्र संताप!
हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी ०३ जून २६
शहरातील वार्ड क्रमांक २ मध्ये नगरपंचायतीच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा उत्तम नमुना पाहायला मिळत आहे. या वार्डात नाली स्वच्छतेचे काम तर करण्यात आले, मात्र नालीतून बाहेर काढलेला प्लास्टिक कचरा आणि दुर्गंधीयुक्त गाळ गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला तसाचपडून आहे. कचरा वेळीच न उचलल्या गेल्यामुळे वाऱ्याने आणि वाहनांच्या वर्दळीमुळे त्यातील अर्ध्याहून अधिक प्लास्टिक कचरा पुन्हा नालीत गेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा नेमका कसला स्वच्छता ‘फार्स‘ सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नियम कडक असतानाही नाली साफ केल्यानंतर तो कचरा त्वरित उचलणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा कचरा अनेक दिवस रस्त्यावरच सडत राहिला. आज बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी होती, तरीही रस्त्यालगत पडून असलेला गाळ व प्लास्टिक कचरा हटविण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवले नाही. यामुळे व्यापारी, पादचारी आणि ग्राहकांना प्रचंड गैरसोयीचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागला.
सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत नाल्या पूर्णपणे मोकळ्या करणे गरजेचे असताना, काढलेला कचरा पुन्हा नालीत जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्याच पावसात नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर आणि दुकानांत शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “जर नालीतील कचरा बाहेर काढून तो पुन्हा नालीतच जाणार असेल, तर अशा दिखाऊ स्वच्छता मोहिमेचा फायदा काय?” असा रोखठोक प्रश्न स्थानिक जनतेने उपस्थित केला आहे.
प्रशासनाने केवळ साफसफाईचे फोटो काढून गाजावाजा करण्यापेक्षा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यावर भर द्यावा. वार्ड क्रमांक २ मधील रस्त्यावर पडून असलेला उर्वरित गाळ व प्लास्टिक कचरा आजच्या आजतात्काळ हटवून परिसर स्वच्छ करावा. तसेच, भविष्यात नाली स्वच्छतेनंतर लगेचच कचरा उचलणारीयंत्रणा कार्यान्वित करावी, अशी तीव्र मागणी हिमायतनगरमधील सुज्ञ नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी केलीआहे.



