मुखेड प्रभाग ९ मधील जनता कचऱ्याच्या विळख्यात; तक्रारींकडे प्रशासनाचा कानाडोळा

▫️घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक आजारपणाच्या उंबरठ्यावर
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १२ जून २६
स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करणाऱ्या मुखेड नगरपरिषदेचा खरा चेहरा प्रभाग क्रमांक ९ मध्ये उघडा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नाल्या कचरा आणि गाळाने तुंबल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.

वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रभाग ९ मधील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने त्या पूर्णपणे तुंबल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तर ही परिस्थिती अधिकच भीषण होते. सांडपाणी साचल्याने परिसरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांना घरात राहणेही कठीण झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

येथील त्रस्त नागरिकांनी अनेक वेळा लेखी आणि तोंडी स्वरूपात नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली आहे. “प्रशासनाला आमचा बळीहवा आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

तक्रार करूनही स्वच्छता कर्मचारी प्रभागाकडे फिरकत नाहीत ,लहान मुले आणि ज्येष्ठांना श्वसनाचे आणि त्वचेचे आजार जडत आहेत.

“आम्ही वारंवार तक्रार करूनही अधिकारी फिरकत नाहीत. नाल्यांमधील पाणी आता घरांच्या भिंतीला लागत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण?” — स्थानिक नागरिक, प्रभाग ९
आता तरी झोपलेले प्रशासन जागे होईल का? की एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




