हाताने उकडला रस्ता! बोगस कामगिरीचा पर्दाफाश बिलोली तालुक्यात युवकांचा संताप; निकृष्ट दर्जाच्या कामावर थेट सवाल

∆ दुगाव-डोंगरगाव रस्त्यावरून गेल्याचा पश्चात्ताप होतोय जनतेला!
∆ रस्त्यावर डांबर आहे की चिखलाचा थर?
कागदावर कोट्यवधींचा निधी… आणि जमिनीवर बोगस बांधकाम!
बिलोली -(ता. प्रतिनिधी) १० जुलै
सत्ताधाऱ्यांनी कितीही दावे केले तरी जमिनीवर वास्तव काही औरच आहे! बिलोली तालुक्यातील दुगाव ते डोंगरगाव या मार्गावर अवघ्या महिन्याभरात डांबरीकरण झालेल्या रस्त्याने अक्षरशः हात जोडलेत. इतकं निकृष्ट काम की, एका युवकाने रस्ता थेट हाताने उकरला… आणि काय आश्चर्य! डांबराखालचा खोटारडेपणा बाहेर आला.
रस्त्याचे उघडपणे उखडले जाणे म्हणजे केवळ भ्रष्टाचाराची पातळी नव्हे, तर जनतेच्या पैशांवर चाललेली बेबंद उधळपट्टी! सार्वजनिक बांधकाम विभागाने जणू निव्वळ कागदावर रस्ता केला आणि जमिनीवर सुतळीचा थर टाकून करोडोंचा हिशोब मांडला.
नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच थातूरमातूर कामे झाली असून, तेथे भ्रष्टाचाराचा घाणेरडा वास दरवळतोय. तरी अजूनही या भोंगळ कारभारावर कुणाचंही लक्ष जात नाही, ही शोकांतिका! या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासमोर आता थेट प्रश्न उभा राहतोय — जनतेचा पैसा अशी बेकायदेशीर लूट चालूच राहणार का?

नांदेड जिल्ह्यात झालेल्या सर्वच रस्त्यांच्या कामांची गुणनियंत्रण यंत्राद्वारे चौकशी झाली पाहिजे. अन्यथा ‘मित्रांचे ठेके आणि जनतेची फसवणूक’ हे समीकरण अधिक मजबूत होणार! सामना विचारतोय – हा विकास आहे की विनाश?
रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरावा लागतोय, आणि सत्ताधाऱ्यांना ‘हातातील विकास’ दाखवायचा आहे. आता जनतेनेच ‘हाताने उकडलेल्या रस्त्याने’ खरी परिस्थिती दाखवून दिली आहे.



