नेते बदलले, पक्ष बदलले, पण आडनावं तीच! नांदेडच्या राजकारणातील घराणेशाहीवर निष्ठावंतांचा हल्लाबोल

▫️राजकारणात घराणेशाही कायम; निष्ठावंत कार्यकर्ते केवळ टाळ्या वाजवण्यासाठीच काय?
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २१ मे २६
पक्ष कोणताही असो, निवडणूक कोणतीही असो; तिकीट आणि सत्ता मात्र त्याच ठराविक घराण्यां भोवती फिरत असल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा उघड झालं आहे. गेल्या अनेक दशकां पासून जिल्ह्याच्या राजकारणावर काही ठराविक राजकीय घराण्यांनी आपले वर्चस्व कायम राखले असून, यामुळे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आता तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. “नेतृत्व बदलते, चेहरे बदलतात; पण आडनावे तीच राहतात,” अशी उपरोधिक आणि संतप्त चर्चा सध्या नांदेडच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
सध्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पुन्हा एकदा अमरनाथ राजूरकर यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी काँग्रेस पक्षात आणि आता भाजप मध्ये राजूरकर यांनाच पुन्हा संधी मिळत असल्याने भाजपमधील अनेक जुन्या, जाणत्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अंतर्गत विरोध दर्शवला असल्याचे समजते. जर या विरोधाची धार तीव्र झाली, तर पुढील उपाय म्हणून अमरनाथ राजूरकर यांच्या सुपुत्राला (राजपूत्राला) उमेदवारी देण्याचा अंतर्गत डाव खेळला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये “आम्ही फक्त सतरंज्या उचलण्यासाठी आणि टाळ्या वाजवण्यासाठीच आहोत का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील घराणेशाहीची पाळेमुळे किती घट्ट आहेत, हे दाखवण्यासाठी जिल्ह्यातील अनेक बड्याराजकीय कुटुंबांची उदाहरणे समोर येत आहेत:
१ चव्हाण परिवार (कै. शंकरराव चव्हाण): एकेकाळी राज्याच्या राजकारणावर हुकूमती प्रभाव असणाऱ्या कै. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण सक्रिय झाल्या आणिआता श्रीजया चव्हाण यांचीही राजकीय एन्ट्री झाली आहे.
२ दुसरा चव्हाण परिवार (कै. बळवंतराव चव्हाण): कै. बळवंतराव चव्हाण यांच्यानंतर कै. वसंतरावचव्हाण आणि आता त्यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे आले असून ते खासदारही झाले आहेत.
३ गोरठेकर परिवार (कै. बाबासाहेब गोरठेकर): गोरठेकर कुटुंबात कै. बाबासाहेब गोरठेकर यांच्या नंतर कै. बापूसाहेब गोरठेकर आणि आता शिरीष गोरठेकर व कैलास गोरठेकर राजकारणात सक्रिय झाले आहेत.
४ पवार परिवार (संभाजी पवार): पवार कुटुंबात संभाजी पवार यांच्या नंतर राजेश पवार यांचे राजकारणसुरू असतानाच आता पूनम पवार यांनाही राजकीय पटलावर पुढे आणले जात आहे.
५ राजूरकर परिवार: अमरनाथ राजूरकर हे देखील आता दुसऱ्या टर्मसाठी तयारीला लागल्याचे बोलले जात आहे.
अनेक वर्षे पक्षासाठी रक्ताचे पाणी करणारे, आंदोलने अंगावर घेणारे आणि पक्षसंघटना तळागाळात मजबूत करणारे कार्यकर्ते कायम उपेक्षित राहत आहेत. कार्यकर्त्यांच्या मते, सध्या पक्षातील निष्ठेपेक्षा‘घराण्याची पार्श्वभूमी‘ अधिक महत्त्वाची ठरत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा मावळत चालला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सुदृढ लोकशाही व्यवस्थेत नवीन आणि सर्वसामान्य घरातील नेतृत्व तयार होणे गरजेचे असते. मात्र, सतत त्याच त्याच कुटुंबांमध्ये सत्ता केंद्रित राहिल्यामुळे स्थानिक स्तरावरील सक्षम आणि नव्या नेतृत्वाला वाव मिळत नाही. आगामी निवडणुकांच्या तोंडावर नांदेड मधील हा‘घराणेशाहीचा‘ मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.



