वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अखेर निलंबित; अवैध खननाला पाठीशी घालणे पडले महागात!

▫️अवैध उत्खनन प्रकरणी कर्तव्यात कसूर; दळवींना भोवला निष्काळजीपणा.
मुखेड (प्रतिनिधी):श्रमिक एकता न्यूज़ १० एप्रिल २६
हिंगोली जिल्ह्याच्या महसूल विभागात आज एकच खळबळ उडाली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर लगाम लावण्याऐवजी, कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. महसूल व वनविभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी ९ एप्रिल रोजी हे निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.
नेमके प्रकरण काय वसमत तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक जोमाने सुरू होती. याप्रकरणी तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, मात्र त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रशासनाने ठेवला आहे. अतिमहत्त्वाच्या शासकीय कामकाजात कसूर केल्याने सर्वसामान्यांमध्ये सरकार बद्दल तीव्र नाराजी पसरली होती.
दळवी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चेउल्लंघन केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, या काळात त्यांनाकोणताही खासगी व्यापार किंवा नोकरी करता येणार नाही.
दळवी यांच्यावरील या कारवाईमुळे वाळू माफिया आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबेदणाणले आहेत. अवैध खननाविरुद्ध तक्रार करणाऱ्या सामान्य जनतेतून या निर्णयाचे स्वागत होत आहे. आता या प्रकरणाची पुढील चौकशी कशी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे



