नांदेड जिल्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; बातमी छापल्याच्या रागातून पत्रकाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पाच जण अटकेत

अर्धापूर (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २८ मार्च २६
सत्य बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून एका पत्रकाराला धक्काबुक्की करून, त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या अर्धापूर पोलिसांनी आवळल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते.
नेमकी घटना काय?
आंबेगाव (ता. अर्धापूर) येथील रहिवासी आणि ‘दैनिक श्रमिक लोकराज्य‘चे प्रतिनिधी रामचंद्र ऊर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे यांनी २५ मार्च २०२६ रोजी एक धाडसी बातमी प्रसिद्ध केली होती. “लहानगावात भोंगा–डीजे बंदीचा निर्णय, पण अवैध दारूवर गावकऱ्यांचा रोष कायम“ अशा मथळ्याखाली हीबातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते.
दिनांक २६ मार्च रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास, मनोज मनपुर्वे हे जेवण करून घराबाहेर पडले असता, गावातील अनिल सावंत यांनी त्यांना भेटायला बोलावले. ते दोघे पोलीस पाटील यांच्या पानपट्टी जवळ बोलत असताना अचानक दोन मोटारसायकल वरून संतोष बोले आणि त्याचे इतर ४साथीदार तिथे आले.
“आमच्या गावाची बातमी छापण्याचा तुला अधिकार काय?” असे म्हणत आरोपींनी मनपुर्वे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेण्याचा (अपहरण) प्रयत्न केला. यावेळी मनपुर्वे यांनी प्रतिकार केला असता, त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि त्यांना पुन्हा गाडीवर बसवून ‘लहान‘ गावाकडे नेण्याचा प्रयत्न झाला.
मनपुर्वे यांचा आरडा ओरडा ऐकून त्यांची पत्नी, आई–वडील, भाऊ आणि गावकरी धावून आले. गर्दी जमा झाल्याचे पाहून आरोपींनी “पुन्हा गावात दिसला तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत तिथून पळकाढला.
याप्रकरणी मनोज मनपुर्वे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदमयांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संतोषबोलेसह पाचही आरोपींना अटक केली आहे.
अर्धापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध बीएनएस (BNS) कलम १३७ (२), ६२, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३) आणि १८९ (२) सह पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय भोसले करत आहेत.
पत्रकारावरील या हल्ल्याचा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असून, गुन्हेगारांवर कठोरकारवाई करण्याची मागणी केली आहे.



