दुष्काळी अनुदानावर डल्ला मारणाऱ्यांवर गुन्हा नोंदवा! मुखेड तहसीलदारांचे पोलिसांना कडक आदेश

▫️बेरळी (खु.) येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; ८ ते ९ वेळा पुरावे देऊनही पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याने खळबळ
मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २७ एप्रिल २६
शासकीय दुष्काळी अनुदानाचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आता महसूलप्रशासन आक्रमक झाले आहे. मौजे बेरळी (खु.) येथील एका जमीन प्रकरणात पेरणी नसतानाही खोटे अनुदान उचलल्याचे सिद्ध झाल्याने, या प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेरळी (खु.) येथील गट क्र. १७५ आणि गट क्र. २२९ मधील जमिनीवर प्रत्यक्षात कोणतीही पेरणी केलेली नव्हती. असे असतानाही संबंधितांनी शासनाची दिशाभूल करून२,२७१ रुपयांचे दुष्काळी अनुदान लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या संदर्भात अशोक मारोती बच्चेवार यांनी तक्रार केली होती, ज्याचा अहवाल मंडळ अधिकारी श्री. जी. एम. गरुडकर यांनी सादर केला होता.
तहसीलदारांनी आपल्या पत्रात अत्यंत गंभीर बाब नमूद केली आहे. मंडळ अधिकारी हे आवश्यक ते सर्वअभिलेख (पुरावे) घेऊन मुखेड पोलीस स्टेशनला ८ ते ९ वेळा गेले होते. मात्र, इतक्या वेळा चकरा मारूनही पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या एका शाखेने पुरावे देऊनही दुसरी शाखा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का करत आहे? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तहसीलदार राजेश जाधव यांनी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा कळविले आहे की, मंडळ अधिकारीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांवर तातडीने नियमानुसार गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही करावी. या आदेशामुळे आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



