मुखेडमध्ये हिंसक प्राण्याचा थरार: शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतमजुराचा भीषण हल्ल्यात जागीच मृत्यू

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १८ ऑगस्ट २६
मुखेड शहरातील यशवंतराव चव्हाण शाळेच्या पाठीमागे असलेल्या भवानी मंदिराच्या माळरानावर शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धावर हिंसक प्राण्याने अत्यंत भयानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा हल्ला इतका भीषण आणि खतरनाक होता की, या मध्येया वृद्धाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मुखेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोतीराम लक्ष्मण वाघमारे (वय ६५ वर्षे, रा. अण्णा भाऊ साठे नगर, मुखेड) असे या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. ते नेहमी प्रमाणे भवानी मंदिराच्या माळरानात खंडाने केलेल्या शेतात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळची वेळ असल्याने साधारण साडेपाच वाजेच्या सुमारास एका अज्ञातहिंसक प्राण्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणी झडप घातली.
प्राण्याने केलेला हा हल्ला अतिशय खतरनाक होता. हिंसक प्राण्याने वाघमारे यांच्यावर इतक्या क्रूरपणे आणि वेगाने हल्ला चढवला की, त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. याहल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने मोतीराम वाघमारे यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला.
या भयंकर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोतीराम वाघमारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे नेण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत रुग्णालयात पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू होती.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर: मोतीराम वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले आणि २ मुली असा मोठा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचा असा अचानक आणि भीषण अंत झाल्याने वाघमारे कुटुंबावर दुःखाचाडोंगर कोसळला असून, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
यशवंतराव चव्हाण शाळेच्या पाठीमागील हा भाग शहरालगतच असल्याने येथे नेहमी नागरिक, महिलाआणि गुराख्यांची वर्दळ असते. अगदी शहराच्या वेशीवर हिंसक प्राण्याचा वावर आढळून आल्याने आणित्यात एका निष्पाप वृद्धाचा बळी गेल्याने स्थानिकांच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या घटनेची तातडीने व गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्या हिंसक प्राण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



