अध्यात्म क्षेत्रातील दीपस्तंभ निखळला; श्री दत्त शिखर संस्थानचे गादीचे महंत मधुसूदनजी भारतीमहाराजांचे निधन

माहूर:- श्रमिक एकता न्यूज़ ०५ एप्रिल २६
अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक देदिप्यमान दीपस्तंभ निखळला आहे. माहूर येथील श्रीदत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांचेदुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरातील दत्तभक्त परिवारावर शोककळा पसरली आहे.
महंत प.पू. अच्युत भारती महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर, सन १९७८ मध्ये संस्थानच्या धार्मिक परंपरेनुसार प.पू. मधुसूदनजी भारती महाराज गादीवर विराजमान झाले होते. गेल्या ४६ वर्षांहून अधिककाळ त्यांनी माहूर गड आणि दत्त शिखराची गौरवशाली परंपरा अत्यंत निष्ठेने आणि भक्तीभावाने जपली.
महाराजांचे संपूर्ण आयुष्य दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी समर्पित होते. अत्यंत साधीराहणी आणि उच्च विचारसरणी लाभलेल्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भक्तांना आध्यात्मिकदिशा मिळाली. त्यांच्या जाण्याने केवळ एका संस्थेचेच नव्हे, तर आध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
दिनांक ४ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरांतून जड अंतकरणाने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासनही सतर्क झाले आहे.
महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी आज, दिनांक ५ एप्रिल रोजी, माहूर शहरासह तालुक्यातील सर्वप्रमुख बाजारपेठा उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दत्त शिखर संस्थानकडून अंत्यविधीच्या कार्यक्रमाची अधिकृत रूपरेषा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, आपल्या लाडक्या ‘मालक‘ महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून भाविक माहूरगडाच्या दिशेने रवाना होत आहेत.



