हायकोर्टाचा मोठा दिलासा! आरटीई प्रवेशाला मुदतवाढ, जुन्याच नियमांनुसार प्रक्रिया

मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्थात आरटीई द्वारे शाळा प्रवेशासाठी १ किमीच्या अटीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली असून पूर्वीच्या नियमांप्रमाणेच प्रवेश देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. आज आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख होती. सरकारनं यंदा या कायद्यात नवी नियमावली लागू करत पूर्वीच्या ३ किमी ऐवजी १ किमीच्या परिसरातीलच शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे आदेश काढले होते. याविरोधात पालकांनी तीव्र विरोध केला, त्याअनुषंगानं नागपूरच्या खंडपीठात याविरोधात याचिका देखील झाल्या. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत काल खंडपीठानं या १ किमीच्या अटीला स्थगिती दिली.
दरम्यान, आजच्या सुनावणीत खंडपीठानं आजची प्रवेशाची शेवटची तारीखही पुढे ढकलली. तसंचआरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर १ किमीचा नियम काढून पूर्वीप्रमाणे ३ किमीचा नियम अपडेट करण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवर हे अपडेशन झाल्यानंतरच आरटीई अंतर्गत ऑनलाईन नोंदणीच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सरकारने जाहीर करावा, असे आदेश नागपूरखंडपीठानं दिले आहेत. यामुळं १ किमीच्या अटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध नसल्यानं नोंदणी होऊ शकली नाही अशा लाखो विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळाला आहे.
आरटीई अंतर्गत एक किलोमीटरच्या अटी विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अॅड. दीपकचटप, अॅड. बोधी रामटेके यांच्यासह आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमरे यांनी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करताना खंडपीठानं राज्य शासनाला आरटीईप्रवेश प्रक्रियेच्या अटीत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.



