महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचा गदारोळ: वंचित व काँग्रेस नगरसेवकांनी विषय पत्रिका हवेत उडवून केला सभात्याग

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड : ११ ऑगस्ट २६
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचे विषय घेतले जात नसल्याचा आणि शहरातील मूलभूत प्रश्नांवर बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत काँग्रेस ववंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मोठा गोंधळ घातला. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीचा निषेध करत संतप्त नगरसेवकांनी चक्क विषय पत्रिका हवेत उडवून देत थेट सभात्याग केला.

मंगळवारी सकाळी महापालिकेच्या इमारतीमधील कै. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर दीपकसिंह रावत आणि नगरसचिव अजित पालसिंह संधू मंचावर उपस्थित होते. सभेचे कामकाज सुरू होताच वंचित आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

वंचित बहुजन आघाडीचे गटनेते इंजिनिअर प्रशांत इंगोले यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली. विरोधीपक्षांच्या नगरसेवकांचे ठराव घेतले जात नाहीत, तसेच मूलभूत प्रश्नांवर सभागृहात नगरसेवकांना बोलू दिले जात नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्या अगोदर शहरातील मूलभूत प्रश्नांवर सभागृहात चर्चा करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. प्रशासना विरोधात पुकारलेल्या या आक्रमक आंदोलनात आणि सभात्यागात वंचितचे गटनेता इंजि. प्रशांत इंगोले, अब्दुल गफार, मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, बाबुभाई खोकेवाला, शोहेब मझर, राहुल सोनसळे, राजश्री गोडबोले-राक्षसमारे, सुनीता जोधले, रमेश गोडबोले, पाशाभाई, मोहसीन खान हलीमा बी, उम्मे बेगम परविन बेगम, ऍड बिलाल, आफिया नाज काझी नाफे आदी नेते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या गदारोळात महापौर कविता मुळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे सांगून नगरसेवकांना शांत राहण्याची आणि जागेवर बसण्याची विनंती केली. मात्र, नगरसचिव अजितपालसिंह संधू हे विषय पत्रिकेचे वाचन करत असतानाच, काँग्रेस आणि वंचितच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि हातातील विषय पत्रिका हवेत उडवत सभागृहातून सभात्याग केला. विरोधकांच्या या सभात्यागानंतर उर्वरित सदस्यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पुढे सुरू राहिले, ज्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे आणि ढिसाळ कारभारावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.



